मुंबई:- शिक्षण मंडळाचा नुकताच दहावीचा निकाल लागला आहे चांगला निकाल लागला म्हणून सगळीकडे आनंद व्यक्त होतोय मात्र हाच निकाल आपल्यासाठी लाजिरवाणा आणि धक्कादायक आहे.ज्या महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे, जीला अभिजात दर्जा मिळाला म्हणून सगळ्यांनी आनंद व्यक्त केला आहे त्याच मराठीत दहावीच्या परीक्षेत महाराष्ट्रातील तब्बल ३८ हजार विद्यार्थी नापास झाले आहेत.*
*’लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ असं म्हणणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थी खरंच मराठी शिकतायेत का, असा प्रश्न पडला आहे. आणि त्याचं कारण म्हणजे नुकताच लागलेला दहावीचा निकाल आहे. या निकालात राज्यात मराठी विषयात तब्बल ३८ हजार ४३७ विद्यार्थी नापास झाले आहेत. मुंबई विभागात तब्बल ४ हजार मुलं मराठीत नापास झाली आहेत तर मराठवाड्यातल्या ८ जिल्ह्यांमध्ये तब्बल १५ हजार ११७ विद्यार्थी नापास झालेत. मराठी विषयात नापास होण्यामागे अनेक कारणं राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितली आहेत. त्यामुळे ही स्थिती सुधारून निकाल चांगला यावा यासाठी विद्यार्थ्यांच्या मराठी विषयावर लक्ष द्यावं लागेल, असं लातूर मंडळाचे अध्यक्ष सांगत आहेत.*
*इंग्रजीपेक्षाही विद्यार्थ्यांना मराठी कठीण जातंय, हे दुर्दैवी आहे. इंग्रजीपेक्षा मराठी अवघड, ३८ हजार ४३७ विद्यार्थी नापास तर इंग्रजीत ६ हजार ७३८ विद्यार्थी नापास झाले आहेत. इंग्रजीच्या तुलनेत मराठी विषयांमध्ये नापास होणा-या विद्यार्थ्यांची टक्केवारी सहा पटीनं जास्त आहे. अनेक घरांमध्ये मराठीला दुय्यम मानतात, पालक मराठीत बोलत नाही परिणामी मराठी कठीण बनल्याचं भाषातज्ज्ञ सांगतात. जागतिक भाषा इंग्रजी, पुढचं शिक्षणही इंग्रजीत मग मराठी शिकून फायदा तो काय, या विचारानं ही स्थिती असंही मत भाषा तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
*नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर भर असावा, असं धोरण असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातच मातृभाषेकडं दुर्लक्ष होतंय हे गंभीर चित्र आहे. मातृभाषेतून एखाद्या विषयाचं आकलन सहज होतं पण तीच येत नाही मग करायचं काय? मातृभाषेतच विद्यार्थी जर नापास होत असतील तर याला जबाबदार कोण? हे प्रश्न आहेत. मराठीचे ढोल पिटणाऱ्या राजकारण्यांनी आणि सर्व स्तरातल्या नागरिकांनी आता धोक्याची घंटा समजावी आणि मराठीकडे तातडीनं लक्ष द्यावं, अन्यथा येता काळ फार कठीण असेल.*